सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

मुलाखत घेणारे अभ्यासापलीकडचे भलतेच प्रश्न का विचारतात?

एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो. एखादा उमेदवार निवडताना, त्याच्यात तुम्ही एच आरवाले काय बघता? या प्रश्नाचं उत्तर खूपदा परिस्थितीवर अवलंबून असतं. परिस्थिती म्हणजे आम्ही कोणत्या जॉबसाठी उमेदवार बघतो आहोत इथपासून ती विशिष्ट व्यक्ती आमच्या कंपनी कल्चरमध्ये फिट होऊ शकेल का इथपर्यंत सर्व काही असू शकतं.

ज्या पदासाठी निवडायचं त्यासाठीच्या अपेक्षा तो उमेदवार पूर्ण करू शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न मुलाखत घेणार्याच्या डोक्यात अग्रस्थानी असतो. उदाहरणार्थ, मला एखाद्या फॅक्टरीसाठी दहा-बारा कामगारांना व्यवस्थित मॅनेज करणारा शिफ्ट सुपरवायझर हवा असेल, तर मी त्या उमेदवारात काय बघेन? 

समजा, एखाद्या कॉलेजमधून मी विद्यार्थ्यांना सिलेक्ट करत असेन, तर मी त्याला डायरेक्ट सुपरवायझरची जबाबदारी देणार नाही, परंतु त्याच्यातली स्किल्स पाहून मला असं वाटू शकतं की, हा किंवा ही उमेदवार पुढे ‘सुपरवायझर’ म्हणून चांगला तयार होऊ शकेल. मग मुलाखत घेताना मी मार्क्स बघेन, शैक्षणिक रेकॉर्ड तपासेन पण त्याहीपेक्षा त्याचं व्यक्तिमत्त्व दहा-बारा कामगारांना मॅनेज करू शकेल, अशा पद्धतीने मी डेव्हलप करू शकेल का, तशी धडाडी त्याच्याकडे आहे का, शिकण्याची, माणसं सांभाळण्याची, गोड बोलून काम करून घ्यायची हातोटी आहे का हे सारं प्राधान्यानं तपासून पाहीन. नुस्ते मार्क चांगले असतील आणि हे सारं नसेल तर मला त्याचा काय उपयोग? म्हणून तर नोकरीसाठीच्या मुलाखतीत टेक्निकल ज्ञानापेक्षा अन्य प्रश्न जास्त विचारले जातात. अनेक मुलं तिथंच कमी पडतात. त्यांना कळतच नाही की अभ्यासापलीकडचे, भलतेच प्रश्न का विचारताहेत?? पण त्या उत्तरातूनच उमेदवारातला स्पार्क (चुणूक) दिसतो. आणि स्वत:तला स्पार्क, प्रगतीसाठी तो वापरण्यासाठी मेहनत, हे सारं ‘एम्प्लॉयबिलिटीत’ येतं. 

दरवर्षी जवळपास पाच लाखांच्या आसपास विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडतात आणि मार्केटमध्ये जवळपास ८ ते १0 लाखांच्या आसपास नोकर्या तयार होत असतात, अशी एक आकडेवारी सांगते. तरीही आपल्यासमोर बेरोजगारांची संख्या वाढते आहे. हे सगळं बदलायचं असेल तर अर्थात सरकार, शैक्षणिक संस्था यांनी प्रयत्न करणं अपेक्षित असलं, तरी आपण स्वत:ही नव्या काळातली कौशल्यं शिकूनच घ्यायला हवीत. मागील आठवड्यात मला नुकत्याच बी.ई. झालेल्या एका विद्यार्थ्याची मेल आली. त्यानं बायोडाटा अँटॅच करून पाठवत लिहिलं होतं, "Dear Sir, PFA and do the needful." हे असं उद्धट वाक्य वाचून कुणीही सुज्ञ एचआरवला त्याला मुलाखतीलासुद्धा बोलावणार नाही. 

पण का? त्याविषयी पुढील भागात. 


(लोकमत, १७ जाने २०१४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: