Confidence लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Confidence लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

कच्च्या इंग्रजीचा पचका


नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजीचे ज्ञान किती आवश्यक आहे? 

एखाद्या ऑफिसमध्ये सर्व जण स्थानिक भाषा आणि राष्ट्रभाषा बोलत असतील तर दररोजचे असे किती संभाषण इंग्रजीत होते? 

खरेच इंग्रजी बोलणे आणि तेही फाडफाड बोलता येणे खरेच गरजेचे आहे का? नोकरी देणारे लोक या परदेशी भाषेवर एवढे प्रेम का करता? असे अनेक प्रश्न मला विचारले जातात.ज्या मुलांना इंग्रजी चांगले बोलता येत नाही त्यांना तर ही भाषा आपल्या प्रगतीतला अडसरच वाटते. 

माझ्या मते, तुम्ही कोणत्या क्षेत्रात तुमचे करिअर करू इच्छिता, आयुष्यात कोणत्या स्तरात पोहोचण्याची तुमच्या इच्छा आहे या गोष्टीवर या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. ऑफिस मधील पत्र व्यवहार, संवाद, कामाचं स्वरूप इंग्रजीत आवश्यक असेल तर आपल्याला इंग्रजी व्यवस्थित लिहिता यायला हवी. आपले विचार इंग्रजीत मांडता यायला हवेत. आयटी, बीपीओ, केपीओ आणि तत्सम सेक्टरमध्ये तर इंग्रजी आवश्यक ठरते. पण कदाचित मॅन्युफॅक्चरिंगमध्ये शॉप फ्लोअरवर कामगारांना सांभाळणार्या शिफ्ट सुपरवायझरला इंग्रजीचे अद्ययावत ज्ञान असण्याची काही आवश्यकता नसते.

एकदा एका ऑटो कॉम्पोनंट बनवणार्या मोठय़ा कंपनीच्या प्लाण्ट मॅनेजर ने मला सांगितले होते, ‘इंटरव्ह्यूच्या वेळी एखादा फाडफाड इंग्रजी बोलणारा इंजिनिअर मी सहसा निवडत नाही, मला माहीत आहे, तो माझ्याकडे काही टिकणार नाही.’ त्याचे हे मत ऐकून मला हसावे की रडावे हे कळले नाही. पण उमेदवार निवडताना अशा गोष्टीही विचारात घेतल्या जातात, हे आपण लक्षात ठेवायला हवे.

सध्याच्या काळात इंग्रजी भाषा बोलता येणे अतिशय महत्त्वाचे आहे, इंग्रजी बोलणार्या उमेदवाराला निवडीत प्रेफरन्स मिळतो. पण नेहमी इंग्रजी येते म्हणून निवड होते असेही नाही. भाषेपेक्षा महत्वाचे असते ते कम्युनिकेशन. संवाद. भाषा कोणतीही असो, तुम्ही तुमचे कम्युनिकेशन कसे करता हे महत्त्वाचे असते. 

मॅनेजरपदासाठी आपण मुलाखत देत असाल तर इंग्रजी गरजेचे ठरते. तुम्ही मल्टिनॅशनलमध्ये काम करत असाल तर तुमचे इंग्रजी कसे आहे हेही बघितलं जाते. पण मुलाखतकर्ता फक्त आपलं भाषाज्ञान बघत नाही हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही तुमची मते कशी मांडता, समोरच्या व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीने प्रभावित करता हे महत्त्वाचे ठरते.

मुलाखतीच्या वेळेस जर इंग्रजीत संभाषण करताना अडचणी येत असतील, तर (आणि तुम्ही एण्ट्री लेव्हलला असाल) मुलाखत घेणार्याला तुम्ही तुम्हाला येत असलेल्या (आणि त्याला समजणार्या) भाषेत मुलाखत देण्याची विनंती करू शकता. मी स्वत: खूप उमेदवारांना ही संधी दिलेली आहे आणि त्यापैकी बरेचसे उमेदवार सिलेक्टही झालेले आहे. 

मात्र तुम्ही विनंती कशी करता, तुमचे तुमच्या विषयाचे ज्ञान, आत्मविश्वास कसा आहे हे ही महत्वाचे. केवळ इंग्रजीत बोलायचे म्हणून हातपाय गाळून, त-त करत बोलण्यात काही हाशील नाही. इंग्रजीची काळजी करू नका, शिकायला आणि नंतर बोलायला इंग्रजी अतिशय सोपी आहे, हे मी अनुभवानं सांगू शकतो.

हिंमत ठेवा.

(लोकमत, ७ फेब्रु २०१४)

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

कॉन्फिडन्स तो का नसतो? कुठून येतो?

श्रीरंग पडबिद्रीकर नावाचा उमेदवार माझ्यासमोर गोंधळून बसला आहे. बिचारा किंचित घाबरलेला, उगाचच. हाताची चाळवाचाळव आणि माझ्या केबिनमध्ये उगाचच चौफेर नजर फिरवतोय. त्याच्या डोक्यावरचं टेन्शन कमी करावं. या उद्देशानं मी श्रीरंगाला विचारलं, ‘काय श्रीरंग कसा आहेस?’ 

‘ठीक आहे सर’ तो. त्याला अजून कम्फर्टेबल बनवावं या उद्देशानं मी परत प्रश्न केला ‘का रे ठीक? चांगला नाहीस?’ तो कसानुसा हसला. म्हणाला, ‘बरा’.
मी हसलो. तोही हसला. 

‘तुझ्या या बायोडेटावर तुझी संपूर्ण माहिती आहे. चांगली आहे, पण तू जर तुझ्याबद्दल थोडी माहिती सांगितलीस तर बरं होईल.’ मी त्याला अजून कम्फर्टेबल करण्याच्या उद्देशानं विचारलं.

मुलाखत घेणारी व्यक्ती ही कोणत्या तरी परग्रहावरून आलेली असते आणि ती खूप दृष्ट असते, असा एक समज उमेदवारांमध्ये असतो. याच समजातून बिचारे मुलाखतीच्या आधीच स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतात. अर्थात, उमेदवाराला छळणारी मंडळीही असतात. पण आता तर अशा मुलाखतकर्त्याला ‘मुलाखती कशा घ्याव्यात’ याचं प्रशिक्षणही अनेक संस्था देत असतात.

माझा आजवरचा मुलाखती घेतानाचा अनुभव मात्र एकच सांगतो, जवळपास ६0-७0 टक्के मराठी मुलं ही मुलाखत देताना आत्मविश्वासाअभावी मागे पडतात. मुलाखत देताना जो आत्मविश्वास उमेदवारांमध्ये अपेक्षित असतो, तो न दाखवल्यामुळे पहिल्या काही सेकंदामध्ये स्वत:बद्दलचं निगेटिव्ह मत तयार करून बसतात.

मागच्या लेखात आपण ‘स्वत:बद्दल’च्या माहितीबद्दल वाचले असेलच. स्वत:विषयी काहीही सांगताना तुम्हाला विचार करावा लागतो. तो विचार झाला की जे आहे ते आत्मविश्वासानं सांगता यायला हवं. शहरातील मुलं, वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या हिंदी भाषिक मुलांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आलेला असतो. हाच आत्मविश्वास मराठी मुलं, स्पेशली ग्रामीण भागातून आलेल्या मुलांमध्ये कमी पडतो. माझंच उदाहरण सांगतो, मी पहिल्यांदा विदर्भातील एक छोट्या खेड्यातून नाशिकसारख्या शहरात अकरावीला प्रवेश घेतला. तेव्हा माझा आत्मविश्वास कधी कधी मला दगा देत असे. इंग्रजी माध्यमात शिकलेले, फाडफाड इंग्रजी बोलणारे विद्यार्थी बघितले की, मी कोशात जायचो; पण जेव्हा माझ्यापेक्षा मठ्ठ मुलं पुढं जायला लागली, तेव्हा लक्षात आलं, काहीतरी गडबड आहे. मी कॉलेजमधील वेगवेगळे फोरम्स जॉईन केले. व्यक्तिमत्त्व विकासावर काम करणार्या एका जागतिक संघटनेत कार्यकर्ता म्हणून काम करू लागलो. हळूहळू माझा आत्मविश्वास वाढू लागला.

आत्मविश्वास ही एका दिवसात वाढणारी गोष्ट नाही. तो तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असावा लागतो. आणि हा आत्मविश्वास जेव्हा तुम्ही स्वत:ला जगासमोर, समाजासमोर मुलाखतीमध्ये जेवढय़ा आत्मविश्वासाने तुम्ही सामोरे जाता, तेवढय़ा टक्क्याने तुमची सिलेक्ट होण्याची शक्यता जास्त असते. मला खूपदा प्रश्न पडतो की, आपल्याकडे ज्या काही गुण/गोष्टी असतात त्याचा उपयोग आपल्याला करता यायला हवा, तो आपण का करत नाही? घाबरत, चाचपडत वागून तुम्ही पुढे येणार नाही.

श्रीरंग पडबिद्रीकरनं याचं आत्मविश्वासावर काम केलं. तो कमावला. पहिली मुलाखत त्याची फेल गेली, पण आता तो एका मल्टिनॅशनलमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणून काम करतोय. तुमची संधीही तुम्हाला अशीच गवसू शकेल. 

(लोकमत, ३१ जाने २०१४ )