शनिवार, २० जून, २०१५

पुढील तीन वर्षांत / पाच वर्षांत तुम्हाला स्वत:ला कुठे बघायला आवडेल’


"सर, पुढील पाच वर्षांत मला मॅनेजर व्हायचं आहे". एक उमेदवार, मुलाखतकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देत सांगत होता.  प्रश्न होता, ‘पुढील तीन वर्षांत / पाच वर्षांत तुला स्वत:ला कुठे बघायला आवडेल’?’

नुकत्याच कॉलेजमधून बाहेर पडणारा हा उमेदवार तीन ते पाच वर्षांत व्यवस्थापक बघण्याची स्वप्नं पाहतो, यात चुकीचं काहीच नाही; परंतु अशा प्रश्नांची उत्तरं देताना थोडं वास्तवाचं, स्वत:च्या कुवतीचं भान ठेवायला नको का? 

बर्याच मुलांना वेगवेगळ्या आणि भन्नाट अशा पदांची भुरळ पडते. बर्याचदा उमेदवाराच्या कामाचा आणि पदाचा काहीच संबंध नसतो. पद म्हणजेच डेसिग्नेशन बर्याचदा फसवी असतात. एका बँकेच्या कर्मचार्याचं पद होतं रिजनल मॅनेजर आणि तो प्रत्यक्षात तो घराघरात / ऑफिसात जाऊन बँकेचे खाते उघण्याचं काम करायचा आणि रिजन म्हणजे तरी केवढा भाग तर  पुण्यातील कोथरुड हे एवढंच त्याचं रिजन. आणि ते मॅनेज करणारा हा मॅनेजर ! 

त्यामुळे अशा प्रश्नांकडेही मुलाखत देताना जरा बारकाईनं पहायला हवंच.

मुळात आपल्या आयुष्याचं ध्येय काय हे जर स्वत:ला क्लिअर नसेल तर अशा किचकट प्रश्नांची उत्तरं जास्तच अवघड वाटतात. बीई आणि एमबीएची डिग्री हातात असेल तर कदाचित नोकरीला लागल्यावर तीन वर्षांत मॅनेजर होण्याची संधी मिळतीलही,  पण हे असं टामटूम मॅनेजर होऊन तुम्ही काय कमवाल?

त्यापेक्षा स्वत:च्या कामाचं ध्येय जरा गांभीर्यानं घ्या आणि तुमच्या बायोडाटामध्ये ऑबजेक्टिव्ह नावाचा जो प्रकारही एकदा वाचाच. खरंतर ते स्वत:चं ध्येय, ते स्वत: लिहावं पण कॉपीपेस्ट करण्याच्या नादात ते काही कुणी वाचत नाहीच. 

नसेलही तुमचं तुम्हाला क्लिअर की आपल्याला पुढे काय करायचं तर स्पष्ट सांगा, तेही अगदी नम्रपणे. ‘‘सर, सध्या तरी माझी प्रायॉरिटी चांगल्या कंपनीत चांगला जॉब मिळावा हीच आहे, पुढील तीन वर्ष या जॉबमध्ये सेटल होऊन कंपनीला योग्य ते आऊटपुट देणं हेच माझं ध्येय असेल’’ 

आता विचार करा, हे उत्तर चांगले की ‘‘मला मॅनेजर व्हायचंय, हे उत्तर चांगलं?’’ विचार करा!
तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर त्या अनुभवांवर चांगले पद केव्हाही मिळेल. मात्र तुम्हाला नुस्तं पद हवंय की ‘रोल’ हवाय? हे महत्त्वाचं. 

तेव्हा तुमचं ध्येय ठरवा, ते तुम्ही मागत असलेल्या जॉबशी लिंक कसं करायचं हे शिका तरच तुम्ही गर्दीत वेगळे दिसाल. नामकेवास्ते टामटूम पदाची प्रौढी मिरवण्यात काय हाशिल?

गुरुवार, १९ मार्च, २०१५

Time Management & Priority Setting: फ्री टाइमचं काय करता? - ते काय असतं?



भ्यासाव्यतिरिक्त तू काय करतोस? म्हणजे अभ्यास नसेल तेव्हा काय करतोस? फुरसतीचा वेळ कसा घालवतोस? 

-असे प्रश्न तीन महिन्यांपूर्वी एका इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही विचारले.
रिकाम्या वेळेत मी माझ्या गर्लफ्रेण्डसोबत असतो. असं त्याचं डिरेक्ट उत्तर होतं. त्याला सरळ रिजेक्ट करण्यात आलं. अभ्यास  नसेल, तेव्हा मैत्रिणीसोबत घालवत असतो हे त्याचं उत्तरही प्रामाणिक असेल, त्यानं ते देण्यात डेअरिंगही असेल. पण या एका उत्तरावरून व्यक्तिमत्त्वाची चुणूक दिसून येते. ज्या वयात करिअरवर लक्ष देण्याची गरज आहे, त्या वयात सगळा वेळ असा घुमण्या फिरण्यात घालवून कसं चालेल?

प्रेमाता पडणं, गर्लफ्रेण्ड असणं, तिला वेळ देणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. पण सगळा वेळ ‘असाच’ जातो, आपल्या हाती असलेल्या वेळातून प्रॉडक्टिव्ह असं काहीच घडत नाही, वेळेचं योग्य नियोजन करता येत नाही हे चूक आहे.

what do you do when you have free/leisure time?

हा प्रश्न मुलाखतीत तसा हमखास येतोच. या उत्तरातूनही तुमच्या व्यक्तिमत्तवाचे पैलू समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

तुम्ही सहज जरा स्वत:ला प्रश्न विचारा की, फुरसतीच्या वेळेत तुम्ही काय करु शकता? काय करता?

 तुमचे छंद जोपासू शकता का? वाचन करता का? चार लोकांमध्ये जाऊन एखाद्या प्रोजेक्टवर काम करू शकता, ट्रेकिंगला जाऊ शकता, गर्लफ्रेण्डसोबत जायलाही हरकत नाही, ग्रूपबरोबर आउटिंगही करु शकता आता या सर्व activities तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या कामासोबत लिंक करता ते महत्त्वाचं ठरतं.

तुमचे छंद तुम्ही जोपासत असाल तर तुमचा स्ट्रेस कमी करायला ते मदत करतात. भरतनाट्यम केल्याने तुमचे कॉन्संट्रेशन वाढते, गाण्याच्या रियाजाने तुमचा आवाज साफ होतो. तुम्ही छान रमता एका वेगळ्या जगात, तुम्ही ट्रेकिंग करत असाल, तर तुमची रिस्क टेकिंग अँबिलिटी लक्षात येते.

पण जेव्हा असा प्रश्न येतो, तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार, याचा विचार करा! काहीतरी इंटरेस्टिंग तुम्ही करू शकताच. फेसबुक / व्हॉट्स अँप वर असणं, पार्टी करणं, खूप टीव्ही बघणं हे इंटरेस्टिंग असू शकतं. परंतु तुमचा वेळ तुम्ही नेमका कसा घालवला याचं उत्तर व्हच्यरुअल प्रेझेन्स असू शकत नाही ना?  तो वेळ का वापरला तिथं याची काही पॉझिटिव्ह साईड सांगता मात्र यायला हवी.

भारतातील व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी आजवर घेतल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बायोटेडामध्ये छंद म्हणजेच हॉबी हा कॉलम हा प्रकर्षाने लिहिलेला असतो आणि निव्वळ लिहिलेला नसतो, तर काही विद्यार्थी ते मनापासून जोपासतात. या सर्वांचा फायदा त्यांना त्याच्या त्यांचा आत्मविश्वास दुणावण्यात होतोच असतो.

दुर्दैवाने महाराष्ट्रातील काही महाविद्यालयातली मुलं पुस्तकंही वाचत नाही. वर्तमानपत्रही रोज वाचत नाहीत.

ते काय उत्तर देणार, या अशा ट्रिकी प्रश्नांचं?

तेव्हा तुम्ही ठरवा, फुरसतीच्या वेळाचं तुम्ही काय करता?